पुणे : ‘राजकारणातील प्रगतीसाठी नव्हे, तर केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेत गेलो आहे. नगरसेवक, आमदार आणि मंत्री म्हणून पुण्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो. यातून काही प्रश्न मार्गी लावले; पण आणखी बरेच करायचे आहे. त्यासाठी खासदार म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे,’ असे मत पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर चार जून २०१९ला त्यांनी आपल्या आमदार आणि मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. पुणे महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, कसबा पेठ मतदारसंघाचे पाच वेळा आमदार अशी बापट यांची यशस्वी कारकीर्द आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
या वेळी बोलताना खासदार बापट म्हणाले, ‘पुण्याच्या सर्वांगीण विकासाठी पालकमंत्री म्हणून ‘पीएमआरडीए’ची स्थापना, पुण्याच्या विकास आराखड्यास मंजुरी, पुणे मेट्रो, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोहगाव विमानतळाचा विस्तार, हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांची निर्मिती, जायका प्रकल्प, २४ तास पाणीपुरवठा, मुंढवा जॅकवेल प्रकल्पाचे पुनरूज्जीवन असे अनेक विकासाचे प्रकल्प शासन स्तरावर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानाच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर अशा दुसऱ्या टप्प्यालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या मार्गाचे काम ही आत्ता सुरू झाले आहे.’
‘रिंग रोडच्या निर्मितीतून शहरातील वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून या विभागात अनेक समाजपयोगी निर्णय घेतले. समाजातील सर्वसामान्य घटकांना योग्य दरात अन्न धान्याचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुरवठा करण्याचे काम या विभागामार्फत होते. गेल्यावर्षीपासून सक्षम सार्वजनिक वितरण प्रणालीचा वापर करून ई पॉसद्वारे धान्य वितरण करण्यात येत आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी दरात रेशन दुकानात अन्न-धान्य उपलब्ध करण्यात येत आहे. नवीन गोदाम धोरण, द्वारपोच योजना, अन्न व औषध पद्धतीमध्ये सुलभता व कालबद्धता आणली,’ अशी माहिती बापट यांनी दिली.
माझ्या कार्यकाळात अन्न परवाना नोंदणीमध्ये राज्य प्रथम क्रमांकावर राहिले. अन्न व औषध भेसळीसाठी कडक प्रावधानाची तरतूद करताना यापूर्वीची सहा महिन्यांची शिक्षा बदलून आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली. अशा विविध योजना मी मंत्री असताना कार्यान्वित केल्याचे बापट यांनी सांगितले.
‘पुण्यातील लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, त्यांच्या सहकार्यामुळे पुण्याचा विकासाला चालना देऊ शकलो. येथील विविध विकासाच्या प्रश्नांबाबत लोकसभेत पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त विकास निधी मिळवण्याचे उद्दिष्ट माझ्यासमोर आहे,’ असे त्यांनी नमूद केले.